बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी | Balshastri Jambhekar Information in Marathi

google-news-icon

बाळशास्त्री जांभेकर यांचा परिचय

‘मराठी वृत्तपत्रांचे जनक’ या उपाधीने ज्यांचा गौरव केला जातो त्या बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी, १८१२ रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले हे त्यांचे जन्मगाव होय. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर असे होते. ते एका व्युत्पन्न पुराणिकाचे पुत्र होते. त्यांची बुद्धी जात्याच अतिशय तेजस्वी व संशोधक होती. त्यामुळे लहान वयातच त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या. त्याचप्रमाणे गणित, भूगोल इत्यादी विषयांमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते.

बाळशास्त्री जांभेकरांना लाभलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या देणगीमुळे त्यांना ऐन तारुण्यातच अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकली. १८३० मध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच बाळशास्त्री जांभेकरांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ‘डेप्युटी सेक्रेटरी’ म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दोनच वर्षांनी या संस्थेचे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

पुढे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारच्या वतीने बाळशास्त्रींची नेमणूक झाली. त्या काळात त्यांनी कानडी भाषा शिकून घेतली. त्यानंतर १८३४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. याच कॉलेजात पुढे त्यांनी गणिताचेही अध्यापन केले. एल्फिन्स्टन कॉलेजातील ते पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होत.

मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीचे काम करण्यासाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली होती. तसेच मुंबई इलाख्यातील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अर्थात, वरीलप्रमाणे जबाबदारीची पदे भूषवीत असतानाच त्यांनी आपला विद्याव्यासंगही चालू ठेवला होता. त्यांना अनेक विषयांमध्ये गती होती आणि त्या त्या विषयातील नवे ज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता.

मराठी वृत्तपत्राचे जनक – बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकरांचे सर्वांत महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे पहिले वृत्तपत्र त्यांनी सन १८३२ मध्ये सुरू केले. ‘दर्पण’ हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा दोन भाषांत प्रसिद्ध होत असे. त्याचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ६ जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन (आणि ‘दर्पण’चा प्रकाशन दिनही!) ‘पत्रकार दिन’ म्हणून यथार्थतेने साजरा केला जातो.

  • CyberBandhu पासकीज म्हणजे काय? | What is Passkeys in Marathi? पासकीज एकाच वेळी दोघांचा काटा काढतंय. याच्या वापराने पासवर्ड आणि टू फॅक्टर ऑथेंटीकेशनची गरज पडणार […]
  • CyberBandhu फ्री डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स | Dark Web Monitoring Tools डार्क वेब मॉनिटरिंग च्या मदतीने स्वतः च्या माहितीवर नजर ठेवा आणि जर माहिती डार्क […]
  • CyberBandhu सायबर सुरक्षा म्हणजे काय? | What is Cyber Security in Marathi? मॅलीशीयस सॉफ्टवेअर, हॅकर, स्कॅमर्स यांच्या पासून स्वतःचा आणि इंटेरनेटशी जोडलेल्या आपल्या यंत्राची सुरक्षा […]
  • CyberBandhu लॅपटॉप सुरक्षा टिप्स | Laptop Security Tips Marathi लॅपटॉप सुरक्षा (Laptop Security) मध्ये डीएनएस पण एक महत्वाचा घटक आहे. याने तुमच्या लॅपटॉपच्या सुरक्षेत लक्षणीय […]

या पत्रातील इंग्रजी भाग बाळशास्त्री जांभेकर लिहीत व त्याचे मराठी भाषांतर भाऊ महाजन करीत असत. ‘दर्पण’ च्या पहिल्याच अंकात त्याचे प्रयोजन स्पष्ट करताना जांभेकरांनी असे म्हटले होते की, “स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले आहे.

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या ‘दर्पण’ च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ‘ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्त्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे. ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकर्त्यांच्या हुकूमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे. ज्या देशांत वृत्तपत्रांना लोकांच्या मनावर परिणाम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे ते देश खचितच धन्य होत!’

दर्पण हे वृत्तपत्र सुमारे आठ वर्षांहून अधिक काळ लोकजागृतीचे आपले कार्य नेटाने पार पाडीत राहिले. २६ जून, १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. ते बंद होण्याच्या सुमारास म्हणजे १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी ‘दिग्दर्शन’ या नावाचे मासिक सुरू केले. त्यामध्ये मुख्यत्वे करून शास्त्रीय नीतिविषयक लेख प्रसिद्ध होत असत. बाळशास्त्रींनी असे म्हटले होते की, “बंगाल प्रांतासारख्या मागासलेल्या प्रांताची तेथे ब्रिटिश सत्तेच्या झालेल्या स्थापनेनंतर झपाट्याने सुधारणा झाली. यास इंग्रजी शिक्षणाची सुरुवात व वर्तमानपत्रांचा प्रसार या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत झाल्या होत्या. तेव्हा बंगालच्या मार्गाने गेल्यास महाराष्ट्रीय समाजात सुधारणा होण्यासही फार विलंब लागणार नाही.”

बाळशास्त्री जांभेकर यांचे समाजसुधारणेचे कार्य

‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ यांमधील बाळशास्त्री जांभेकरांच्या लेखांवरून त्यांचा समाज- सुधारणेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आपल्या समाजाचे मागासलेपण दूर व्हावे आणि त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी त्यांची तळमळ होती. भारतात इंग्रजी सत्तेची झालेली स्थापना आणि त्यानंतर भारतीय समाजात होऊ घातलेले परिवर्तन या घडामोडींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते. त्यावरून त्यांची अशी खात्री पटली होती की, आपल्या समाजाची प्रगती होण्यासाठी आपण पाश्चात्त्य विद्या आत्मसात केली पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांच्या प्रसारावर भर दिला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांचा त्याग करण्याची तयारी आपण होऊन दर्शविली पाहिजे.

त्यांच्या या विचारांतूनच त्यांनी समाजसुधारणेचा पक्ष घेतला होता. भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात, किमान त्यांना आळा बसावा, अशी त्यांची मनोभूमिका होती. त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. आपल्या लोकांच्या मनावरील परंपरागत विचारांचा पगडा दूर व्हावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विधवाविवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्याकरिता गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहवून घेतला. अर्थात, समाजसुधारणेच्या बाबतीत जांभेकरांनी पुनरुज्जीवनवादी सुधारणावाद किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवाद यांवरच भर दिला होता. तत्कालीन समाजाचा कर्मठपणा विचारात घेता ते योग्यही होते.

श्रीपती शेषाद्री प्रकरण

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनातील श्रीपती शेषाद्री प्रकरण म्हणजे, धर्म- सुधारणेच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांना किती त्रास सोसावा लागला आणि सनातनी हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा कसा छळवाद मांडला, याचा पुरावाच होय. बाळशास्त्री जांभेकर हे सुधारणावादी असले तरी हिंदू धर्माविषयी त्यांना अभिमानच होता. म्हणून हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत घ्यावे असा त्यांचा आग्रह होता व तसे प्रयत्नही त्यांनी चालविले होते. त्यातूनच हे प्रकरण उद्भवले.

शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही दोन मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यांतील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती याने नारायणप्रमाणे धर्मांतर करू नये म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी श्रीपतीच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळविला. खरे तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते. पण तो काही काळ मिशनऱ्यांनी चालविलेल्या शाळेत राहिला होता.

एवढ्या कारणावरून त्याला हिंदू मानण्यास परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता. त्यावर बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपतीला शास्त्रोक्त प्रायश्चित्त देऊन आणि शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेता येईल, असे प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या शुद्धीकरणाला काही धर्मपंडितांची व शंकराचार्यांची अनुमती मिळवून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले. तथापि, सनातनी ब्राह्मणांना हे शुद्धीकरण रुचले नाही. त्यांनी जांभेकरांवर बहिष्कार टाकला आणि त्यांची निंदानालस्ती आरंभिली. जांभेकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी करण्याचे उद्योग लोकांनी थांबविले नाहीत.

शिक्षणक्षेत्रातील कार्य

जांभेकरांनी शिक्षणक्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. शिक्षणक्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे कार्य बाळशास्त्रींनी केले होते. इतिहास, भूगोल, गणित, व्याकरण, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच रचली होती.

ग्रंथसंपदा

बाळशास्त्रींना अनेक विषयांत गती होती. वाङ्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये ते निष्णात होते. गणित व ज्योतिषशास्त्र या विषयांतही त्यांचा अधिकार फार मोठा होता. ‘शून्यलब्धि’ वर मराठी भाषेतील पहिले पुस्तक त्यांनी लिहिले.

बाळशास्त्री जांभेकर इतिहाससंशोधक म्हणूनही ज्ञात आहेत. त्यांनी प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी संशोधन केले आणि त्यावर काही लेख लिहिले. यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले होते.

नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर १ व २, बालव्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, भूगोलविद्या, इंग्रजी-मराठी धातुकोश यांसारख्या ग्रंथांचे कर्तृत्व बाळशास्त्रींकडे जाते; या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीचे संपादनही त्यांनी केले आहे.

कार्याचे मूल्यमापन

बाळशास्त्री जांभेकरांची विद्वत्ता अष्टपैलू होती. ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’, ‘मराठी वृत्तपत्रांचे जनक’, ‘आद्य इतिहाससंशोधक’, ‘आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी’, ‘सुधारणावादाचे आद्य प्रवर्तक’, ‘व्यासंगी पंडित’, ‘आद्य समाजसुधारक’ अशा बिरुदावलींनी त्यांचा यथार्थ गौरव केला जातो; खरे तर, त्यांनी आपल्या विद्वत्तेचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी न करता ती समाजाच्या हितासाठी उपयोगात आणली; यातच बाळशास्त्रीजींचे मोठेपण सामावले आहे.

जांभेकरांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत समाजजागृतीच्या कार्याची चिंता वाहिली. महाराष्ट्रातील इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीच्या कालखंडात येथील समाज अंधकारात चाचपडत होता. परकीय राजवटीने आरंभिलेल्या व्यापक परिवर्तनाच्या संदर्भात आपण कोणती भूमिका घ्यावी, हेच समाजातील बहुसंख्य लोकांना समजेनासे झाले होते. अशा वेळी या समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य ज्या काही द्रष्ट्या समाजधुरिणांनी केले, त्यांमध्ये बाळशास्त्री जांभेकर अग्रभागी होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्राच्या बुद्धीला आधुनिक वळण लावण्याच्या कामी त्यांनी पहिला मान मिळविला. म्हणूनच महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांमध्ये त्यांचे स्थान श्रेष्ठ समजले जाते.

वयाच्या चौतिसाव्या वर्षी १७ मे, १८४६ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचे अकाली निधन झाले.

मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला मानले जाते?

बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक मानले जाते.

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी व कुठे झाला?

बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी, १८१२ रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी त्यांचा जन्म झाला.

बाळशास्त्री जांभेकर यांचं पूर्ण नाव काय आहे?

त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर असे होते.

दर्पण या वृत्तपत्राचे संपादक होण होते?

बाळशास्त्री जांभेकर ही या वृत्तपत्राचे संपादक होते.

मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?

दर्पण ही मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे.

दर्पण वृत्तपत्र कधी सुरू झाले?

इसवी सन १८३२ साली दर्पण वृत्तपत्राची सुरुवात झाली.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment