पृथ्वीची सविस्तर माहिती | Earth Information Marathi

google-news-icon
  • पृथ्वीचा व्यास-१२,७५६ किलोमीटर
  • पृथ्वीचा सूर्यापासून अंतर-१४.९५ कोटी
  • परिवलन- २३ तास ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंद
  • परिभ्रमण- ३६५.२५६ दिवस
  • आस कलण्याचा अंश- २३.४५
  • पलायन वेग- ११.१८६ किलोमीटर प्रति सेकंद
  • पृथ्वीचा मुक्तिवेग -११.२ किलोमीटर प्रति सेकंद

     

पृथ्वी कशी तयार झाली?

साधारण ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यासोबत पृथ्वी आणि इतर ग्रह तयार होऊ लागले. ज्यावेळी सुरुवातीला पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी ती एक आगीचा मोठा गोळा होती! त्या आगीच्या गोळ्याच्या पृष्ठभागावर प्रचंड मोठे ज्वालामुखी होते. त्यांचा मोठया प्रमाणात उद्रेक व्हायचा. त्यामुळे सर्व लाव्हारस पृष्ठभागावर पसरलेला होता. नंतर पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली. ज्यावेळी पृथ्वी गरम म्हणजेच युवावस्थेत होती तेव्हा ती स्वतःभोवती फक्त 8 तासात एक फेरी पूर्ण करायची. आता ती जवळपास 24 तासात फिरते. जेव्हा चंद्राची निर्मिती झाली तेव्हापासून पृथ्वीचा परिवलनाचा वेग मंदावत गेला. अजून सहित तो मंदावत आहे. दर शतकाला 3-4 मिलि सेकंद एवढा.

  • ४२ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी स्वतःभोवती २१ तासात फिरायची. म्हणजेच त्या काळात दिवस सुमारे १०.५ तासांची दिवस रात्र असावेत. पृथ्वीला सूर्याभोवती भ्रमण करण्यासाठी लागणारा काळ आज तेवढाच मानला तर ( 365 X 24 ) तर त्या काळी पृथ्वीच्या एक वर्षातील दिवसांची संख्या सुमारे 417 ( 365 X 24/27 ) होती.
  • पृथ्वीच्या गती – पृथ्वी ही गतिमान असल्यामुळे पृथ्वीवर दिवसरात्र पूर्ण होतात, एक वर्ष होते, इ. अशा घटना घडतात. अशा काही घटना पृथ्वीच्या भ्रमणामुळे होते. पृथ्वीच्या काही विशेष गती आहेत.
  • अक्षीय गती – पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती २३ तास ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात एक फेरी पूर्ण करते. पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे दिवस आणि रात्र यांच्या वेळेत फरक आढळतो.
  • कक्षीय गती – पृथ्वी ज्या गतीने तिच्या कक्षेत फिरते त्या गतीला कक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा वेग 1 वर्ष आहे.
  • परांचन गती – पृथ्वीच्या अक्षाच्या फिरण्याच्या गतीला परांचन गती म्हणतात. पृथ्वीचा जो अक्ष आहे तो आकाशात २६ हजार वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच सुमारे 72 वर्षांनी हा अक्ष एक अंश सरकतो. या परांचन गतीमुळे ठरावीक काळाने पृथ्वीचा ध्रुवतारा बदलत असतो. अक्षाच्या स्थितीत होणारा हा बदल कालांतराने कालांतराने ऋतुचक्राचा आरंभ आणि त्याच्याशी निगडीत असलेला महिना याचा संबंध बदलून टाकतो. सध्या चैत्र महिन्यात वसंत ऋतुचे आगमन होत असेल तर सुमारे 2100 वर्षांनी त्याचा प्रारंभ वैशाख महिन्यात होऊ लागेल.
  • अक्षाच्या कोनाची गती – पृथ्वीचा अक्ष आज साडे तेवीस अंशातून कललेला असला तरी अक्षाचा हा कोनसुद्धा स्थिर नाही. ही अक्षाची तात्पुरती स्थिती आहे. सुमारे 42 हजार वर्षात अक्षचा कोन 22 अंशापासून वाढतो आणि पुन्हा 22 अंशापर्यंत खाली उतरतो. अक्षाच्या या आवर्तनामुळे एकाच स्थानावरील ऋतुंच्या तीव्रतेमध्ये कमी जास्त फरक पडेल. समजा, पथ्वीचा अक्ष 25 अंशातून कलला, तर उत्तर भारतात हिवाळ्यांमध्ये बर्फ पडण्याची शक्यता आहे.

पृथ्वीचे वातावरण

पृथ्वीचे वातावरण मुख्यतः नायट्रोजन वायूंचे असून त्याचे प्रमाण ७८% आहे. वातावरणात ऑक्सिजन २१ %आणि उरलेला भाग अरगाॅन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम, मिथेन, क्रिप्टाॅन आणि हायड्रोजन वायूंचा आहे. पाण्याची वाफही अत्यल्प प्रमाणात आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ८०० किमी उंचीपर्यंत हा वातावरणाचा पट्टा आहे. पण वातावरण नक्की कुठे संपते आणि अवकाश कुठे सुरु होते त्याची सीमारेषा मात्र नक्की सांगता येत नाही.

वातावरणाचे सामान्यतः पाच भाग आहेत. जमिनीपासून २० किमी उंचीपर्यंत ‘ट्रोपोस्फिअर‘, २०-५० किमी पर्यंत ‘स्ट्रॅटोस्फिअर‘, ५०-८० किमी पर्यंत ‘मेसोस्फिअर‘, त्यापुढच्या ८५*६३० किलोमीटरच्या बऱ्यापैकी विरळ असणाऱ्या भागाला ‘थर्मोस्फिअर‘ आणि त्यापुढच्या ८०० किमी पर्यंतच्या वातावरणात जणू हवा नाहीच असे वाटणाऱ्या भागाला एक्झोस्फिअर म्हणतात. हवेतील वायूचे काही रेणू जमिनीपासून १० हजार किमी उंचीवरही सापडतात, त्यामुळे वातावरणाची उंची तिथपर्यंत आहे असेही मानले जाते!

जेव्हा परतीच्या प्रवासात अवकाशातून पृथ्वीकडे अवकाशयाने झेपावतात, तेव्हा मात्र जाणवेल असा वातावरणाचा विरोध जाणवतो तो पृथ्वीपासून १०० किमी असताना ! वातावरणातील जमिनीलगत असणाऱ्या ट्रोपोस्फिअरमध्ये, पृथ्वीची परिवलन गती, सागरी प्रवाह आणि सूर्याच्या उष्णतेमुळे हवेची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. या हालचालीत तयार होणाऱ्या वाऱ्यांचा सरासरी वेग दर तासाला ५१५ किमी एवढा प्रचंड असतो.

चुंबकीय क्षेत्र आणि ध्रुवीय पट्टे

पृथ्वीवरील वातावरण आणि  पृथ्वीभोवतालचे चुंबकीय क्षेत्र, अवकाशातून येणाऱ्या अनेक हानीकारक प्रारणांना थोपवून धरतात. सूर्याकडून सौरवाताबरोबर चुंबकीय बलरेषांवरुन घसरत ध्रुवीय जागी असणाऱ्या नरसाळ्यासारख्या रचनांवरून खाली येतात. जेव्हा हे कण वातावरणात शिरतात, तेव्हा हवेतील अणूंबरोबर त्यांची आंतरक्रिया होऊन तेथील अणूंचे तात्पुरते आयनीभाव होते. यावेळी विविध रंगांची द्रव्य प्रकाशाची प्रकारे हे आयन बाहेर टाकतात.

त्यामुळे निरनिराळ्या रंगाची उधळण असलेले ‘अरोरा’ ध्रुवीय रंगपट्टे, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या क्षेत्रात, आकाशात दिसतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सूर्याकडील भागात कमानीसारखे चेपलेले तर विरुद्ध दिशेस शेपटासारखे किंवा खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे आहे असे म्हणतात. पृथ्वीभोवतालचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाशयानांमधील अंतराळवीरांचेही रक्षण करतात!

Aurora

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचं बाह्यरंग तर आपण खुल्या डोळ्यांनी पाहतोच पण पृथ्वीचं अंतरंग पाहणं मात्र अशक्य आहे. तर पृथ्वीचं अंतरंग आपल्याला भूशास्त्रज्ञांनी भूकंपलहरींवरून काढलेल्या तर्कानुसार पाहावं लागतं.

आज आपल्यासमोर जे पृथ्वीच्या अंतरंगाचं चित्र आहे ते असं आहे. ( अर्थातच भूकंप लहरींनी काढलेले तर्क कधीच अचूक नसल्यानं हे आकडे हे थोडेसे अंदाजपंचेच आहेत. भूशास्त्राच्या वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांत त्यामुळे वेगवेगळे आकडे सापडतात. ) सामान्यतः भूशास्त्रज्ञ अंतरंगाचे तीन भाग समजतात.

पृथ्वीचं सर्वात वरचं आणि आपल्या पायाखालचं जे कवच ( क्रस्ट ) आहे ते सरासरी ४० किमी आहे. त्याच्याखालचा मधला मोठा मँटल हा सरासरी २९३० किमी आणि सगळ्यात खालचा म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासचा गाभा ( म्हणजे दोन्ही कोअर्स मिळून ) हा सरासरी ३४०० किमीचा आहे. हे सगळे थर मिळून पृथ्वीची त्रिज्या ६३७० किमी होते.

पृथ्वीच्या कवचाची जाडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आढळते. उदा. समुद्राखाली ती ५-१० किमी, जमिनीखाली ४० , तर पर्वतांखाली ती ६५-९५ किमी आढळते. या विविधतेमुळे भूशास्त्रज्ञ ती ४० किमी मानतात. या कवचाच्या निर्मितीनंतर पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णता बाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे.

पृथ्वीचे अंतरंग | Earth Internal Structure
हे चित्र फक्त दाखवण्यासाठी आहे. वास्तविक असे नाही.

या कवचाखालच्या मँटलचे दोन भाग पडतात. कवचाखालील ‘अपर मँटल’ हे फक्त ६३० किमी आहे. त्याखालचं ‘ लोअर मँटल ‘ हे २३०० किमी जाडीचं आहे. या दोघांमध्ये भूकंप लहरींचे वेगवेगळे गुणधर्म आढळतात. हे दोन्ही थर मिळून एकूण २९३० किमी जाडीचं मँटल हे पृथ्वीच्या आकारानं ८०% आणि वजनानं पृथ्वीच्या ६७% आहे. या मँटलमध्ये लोखंड आणि मॅग्नेशियम हे धातू आहेत असं मानतात. हा मँटल घन आहे पण तो प्लॅस्टिकसारखा वाकूही शकतो.

या मँटलच्या खाली पृथ्वीच्या केंद्राशी असलेला ‘ गाभा ‘ आहे. याचेही दोन मुख्य भाग आहेत. मँटलच्या खालील ‘ बाह्य गाभा ( आंतर कोअर ) हा २३०० किमी जाडीचा आहे तर, सगळ्यात आतील ‘अंतर्गाभा ( इनर कोअर )’ हा ११०० किमी जाडीचा आहे. बाहेरचा गाभा हा द्रवरूप आहे आणि तो फिरत असल्याकारणानं विजेच्या मोटारीसारखी प्रक्रिया होऊन पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र मिळतं हा सिद्धांत प्रथमत : १९४९ साली केंब्रिज विद्यापीठातील ई.सी. बुलार्ड यांनी मांडली.

हा सिद्धांत किती बरोबर आहे ते माहीत नाही पण ज्या ग्रहांच्या गाभ्यामधे असा फिरणारा द्रव आढळलेला नाही ( उदा. चंद्र आणि मंगळ ) त्यांच्यामधे असे चुंबकत्व अद्याप सापडलेलं नाही. भूकंप लहरींचा गुणधर्म हा आहे की यांच्यातल्या प्राथमिक लहरी या द्रवातून प्रवास करू शकतात पण दुय्यम लहरी या त्यातून प्रवास करू शकत नाही. यावरून शास्त्रज्ञांना या पृथ्वीच्या गाभ्याचे दोन भाग आहेत आणि त्याच्यातला बाहेरचा मोठा गाभा द्रवरूप आहे हे उमगलं.

पृथ्वीच्या कवचापासच्या भागाबद्दल आपल्याला आतल्या भागापेक्षा जास्त माहीत आहे. पण तेही मुबलक प्रमाणात माहीत आहे. कवचाच्या खालील मँटलमध्ये १५-२५० किमी खोल जो भाग आहे, भूकंप लहरी या थराच्या खालच्या आणि वरच्या भागाच्या मानानं खूपच हळू प्रवास करतात. या थराच्या क्षीणपणाला अर्धवट वितळलेले खडक कारणीभूत आहेत. या ‘झोन’ला अॅस्थेनोस्फिअर असं म्हणतात. त्याच्या खालच्या मँटलच्या भागाला मेसोस्फिअर असं म्हणतात. अॅस्थेनोस्फिअरच्या वरच्या भागाला लिथोस्फिअर असं म्हणतात. अॅस्थेनोस्फिअरच्या वितळलेल्या खडकांवरच लिथोस्फिअरचे १०० किमी जाडीचे भूखंड तरंगत असतात. यामुळेच भूखंडही हळूहळू सरकू शकतात आणि सरकतातही! पण हे माणसाला कळायला बरीच शतकं उजाडावी लागणार होती!

या पूर्ण गाभ्याचं तापमान जास्त म्हणजे सरासरी ५००० अंश सेंटिग्रेड असतं. या गाभ्याची घनताही प्रचंड असते. आणि त्यात लोखंडाचं प्रमाणही जास्त आहे. बाहेरच्या कवचामुळे या गाभ्याचं तापमान फार खाली गेलं नाहीये. याशिवाय पृथ्वीच्या अंतर्भागात असणारे युरेनियम, थेरियम आणि पोटॅशियम यांचे रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप्स हे मंद गतीने स्थिर मूलद्रव्यांमध्ये ( स्टेबल एलिमेंट्स ) रूपांतरीत होतात आणि तसं होताना बरीच ऊर्जा बाहेर प्रक्षेपित करतात.

त्यामुळेही पृथ्वीचा अंतर्गाभा इतकातप्त आहे. पृथ्वीच्या अंतर्भागातून जी ऊर्जा तिच्या कवचाला मिळते, त्याच्या २००० पट ऊर्जा कवचाला सूर्याकडून रोज प्राप्त होते ! असं मानतात की ४०० कोटी वर्षाच्या इतिहासात यामुळेच या गाभ्याचं तापमान फक्त ११० अंश सेल्सिअसनं कमी झालंय. साधारणत : १००० कोटी वर्षांनी हा ऊर्जेचा साठा संपून जाईल. त्यानंतर पृथ्वी थंड होईल. शेवटी ती पूर्णपणे गोठून जाईल. पण याची काळजी करावी लागणार नाही ! कारण तोपर्यंत कोणताही जीव जिवंत नसणार.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

Hubble Telescope Facts Marathi facts about earth marathi