साने गुरुजी माहिती मराठी | Sane Guruji Information In Marathi

google-news-icon
नाव पांडुरंग सदाशिव साने
जन्म २४ डिसेंबर १८९९
जन्मगाव पालगड कोकण
वडिलांचे नाव सदाशिव साने
आईचे नाव यशोदा
शिक्षण बी ए आणि एम ए
मृत्यू ११ जून १९५०

‘खरा तो एकचि धर्म | जगाला प्रेम अर्पावे ||’

यांसारख्या काव्यपंक्तींतून आपल्याला मानवधर्म शिकविणाऱ्या साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. त्यांचा जन्म २४ डिसेंबर, १८९९ रोजी कोकणातील पालगड या गावी झाला. गुरुजींचे वडील सदाशिवराव पालगड या गावी खोताचे काम करीत असत. त्यांचे घराणे मूळचे वैभवसंपन्न असले तरी सदाशिवरावांच्या काळात मात्र आर्थिकदृष्ट्या ते डबघाईला आले होते.

साने गुरुजी आणि मातृप्रेम

गुरुर्जीच्या आईचे नाव यशोदा असे होते. लहानपणापासूनच गुरुजी चे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते व त्यांच्यावर आईच्या शिकवणुकीचा मोठाच प्रभाव पडला होता. गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार घडविले त्यातूनच त्यांचा जीवनविकास झाला. सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा त्यांना त्यांच्या आईनेच दिला. ‘श्यामची आई‘ या पुस्तकात गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. आचार्य अत्रे यांनी ‘मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र‘ अशा शब्दांत या पुस्तकाचे वर्णन केले आहे.

साने गुरुजींचे शिक्षण

साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच म्हणजे पालगड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी मात्र त्यांना दापोली, औंध, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागले. सन १९१८ मध्ये ते पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या न्यू पूना कॉलेजात आपले नाव दाखल केले. याच कॉलेजातून त्यांनी बी. ए. व एम. ए. च्या पदव्या संपादन केल्या.

शिक्षण पूर्ण झाल्यावर साने गुरुजींनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. तेथील वसतिगृहाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी गुरुजी अतिशय समरस झाले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून स्वावलंबन व सेवावृत्तीचे धडे दिले. १९२८ मध्ये त्यांनी ‘विद्यार्थी‘ या नावाचे मासिक सुरू केले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

विद्यार्थिदशेपासूनच साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या राजकीय विचारांचा प्रभाव होता. सन १९२१ पासून त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली होती. १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची सुरुवात केल्यावर गुरुजींनी आपला शिक्षकी पेशा सोडला आणि स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्याबद्दल त्यांना अनेकदा कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगातील वास्तव्यातच त्यांची विनोबा भावेंशी भेट झाली. पुढे १९३६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ग्रामीण भागात आपले अधिवेशन भरविण्याचे ठरविले. त्याचे ठिकाण म्हणून खानदेशातील फैजपूरची निवड करण्यात आली. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गुरुजींनी जिवापाड मेहनत घेतली.

शेतकरी परिषद

सन १९३८ च्या दुष्काळात खानदेशातील शेतकऱ्यांची पिके बुडाली. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा सारा माफ करावा, या मागणीसाठी साने गुरुजींनी जळगावला शेतकऱ्यांची एक परिषद आयोजित केली. १९३८ मध्ये त्यांनी ‘काँग्रेस’ या नावाचे एक साप्ताहिकही सुरू केले.

‘चले जाव’ चे भूमिगत कार्य

सन १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीच्या काळात साने गुरुजींनी भूमिगत राहून ही चळवळ नेटाने पुढे चालविण्याचा प्रयत्न केला; परंतु १९४३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. पुढे १९४५ मध्ये त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली.

साने गुरुजी आणि ‘पत्री’ काव्यसंग्रह

‘पत्री’ हा साने गुरुजींचा पहिलाच काव्यसंग्रह. छापून होताच तो ब्रिटिश सरकारने जप्त केला. अशा परिस्थितीतही ‘पत्री’ च्या प्रती महाराष्ट्रभर पसरल्या !

असत्य अन्यायाना तुडवू दुष्ट रूढींना दूर उडवू । घाण आता ठेवणार नाही । सुखवू प्रियतम भारतमाई ||

यांसारख्या ओळींनी त्या काळी स्वातंत्र्याचा आणि समतेचा संदेश घराघरांतून पसरवला.

बलसागर भारत होवो । विश्वात शोभुनी राहो || हे कंकण करी बांधियले । जनसेवे जीवन दिधले ।

राष्ट्रार्थ प्राण हे उरले | मी सिद्ध मराया हो ! |”

ही कविता आजही आपण विसरू शकत नाही; अन् आजही आपणास राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीय एकात्मतेची व राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्यास ही कविता समर्थ आहे.

समाजवादी विचारसरणीचे आकर्षण

साने गुरुजींना समाजवादी विचारसरणीविषयी आकर्षण वाटत होते. काँग्रेसमध्ये असतानाच ते समाजवादाच्या प्रभावाखाली आले होते. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांना त्यांचा विरोध होता. विशेषतः जातिभेद आणि सामाजिक विषमता यांविषयी त्यांना अत्यंत चीड होती. अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध त्यांनी प्रचाराची जोरदार आघाडी उघडली होती. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी १९४६ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सहा महिने प्रचाराचे रान उठविले; पण त्याचा काहीही फायदा होत नाही, असे पाहिल्यावर त्यांनी पंढरपूर येथे प्राणांतिक उपोषण आरंभिले; त्यामुळे पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर थोड्याच दिवसांत काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि त्याने समाजवादी पक्षाची स्थापना केली. साने गुरुजीही या नव्या पक्षात सामील झाले. सन १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना‘ हे साप्ताहिक सुरू केले.

एकात्मतेसाठी अथक प्रयत्न

साने गुरुजींनी आंतरभारती चळवळ सुरू केली होती. त्यामागची त्यांची कल्पना अशी होती की, भारत हा विविध प्रांत, धर्म, भाषा, जाती असलेला देश आहे. तथापि, भारतीय जनतेत असलेल्या या विविधतेमुळे ऐक्याची भावना वाढीस लागण्यास काही वेळा अडसर निर्माण होतो. आपल्या देशाचे ऐक्य अभंग राखण्यासाठी निरनिराळ्या प्रांतांतील लोकांनी एकत्र यावे, त्यांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, एकमेकांच्या चालीरीती समजावून घ्याव्यात, एकमेकांवर प्रेम करावे. त्यायोगे त्यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ होऊन राष्ट्रीय ऐक्यालाही बळकटी येईल. गुरुजींची आंतरभारतीची कल्पना म्हणजे भारताच्या एकात्मतेविषयी त्यांना वाटत असलेल्या कळकळीचे द्योतकच होय.

उदात्त मानवतावादी साहित्य

साने गुरुजी हे एक उत्कृष्ट साहित्यिकही होते. त्यांनी विपुल साहित्य लिहिले आहे. त्यांच्या साहित्यात कादंबऱ्या, कथा, लेख, निबंध, चरित्रे, काव्य, नाट्यसंवाद इत्यादी विविध वाङ्मयप्रकारांचा अंतर्भाव होतो. त्यांच्या ठिकाणी असलेली समाजहिताची तळमळ, मानवतावादी दृष्टिकोन आणि उदात्त विचारसरणी यांचा प्रत्यय आपणांस त्यांच्या साहित्यातून येतो. त्यांची भाषा साधीच पण ओजस्वी होती. तिला एक प्रकारची गहिरी धार होती; त्यामुळे ती वाचकांच्या मनाची पकड घेत असे.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पाहिलेले स्वतंत्र भारताचे स्वप्न अन् स्वातंत्र्यानंतरचे भारतातील राजकीय वास्तव यामुळे हळव्या मनाच्या साने गुरुजींचा अपेक्षाभंग झाला. त्यांनी पाहिलेल्या स्वतंत्र भारताच्या कल्पनांचा होत असलेला चुराडा पाहणे निःस्पृह व्यक्तिमत्त्वाच्या साने गुरुजींना शक्यच नव्हते; त्यामुळे त्यांनी मनोमन स्वतःचे जीवन संपविण्याचा कृतनिश्चय केला. त्याची परिणिती त्यांनी आत्महत्या करण्यात झाली.

११ जून, १९५० रोजी विनोबांचा हा ‘अमृताचा पुत्र’ निजधामास गेला. त्यांच्या निधनाने एक भावनोत्कट, संवेदनशील, राष्ट्रवादी परंतु मानवधर्माचा संदेश देणारे व्यक्तिमत्त्व कायमचे लयास गेले.

साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके

श्याम, श्यामची आई, क्रांती, तीन मुले, समाजधर्म, स्त्री-जीवन, इतिहासाचार्य राजवाडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, पत्री (काव्यसंग्रह).

बहुतेक ग्रंथलेखन गुरुजींनी तुरुंगात असतानाच केले. तुरुंगात असतानाच त्यांनी विनोबांनी सांगितलेली ‘गीताई‘ ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका लिहून घेतली. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असतानाच लिहिली.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment