संत नामदेव माहिती मराठी | Sant Namdev Information in Marathi

google-news-icon

महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील आणखी एक महान संत म्हणून संत नामदेवांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म शके ११९२ (इ. स. १२७०) मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गोणाई असे होते. नामदेवांचे वडील मराठवाड्यातील नरसी-बामणी या गावाचे रहिवासी; परंतु पुढे ते पंढरपुरास येऊन स्थायिक झाले. अर्थात, नामदेवांचे जन्मस्थळ पंढरपूर की नरसी-बामणी, असाही एक वाद आहे; पण याबाबत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी असे मत व्यक्त केले आहे की, नामदेवांच्या जन्माअगोदरच काही वर्षे त्यांचे आई-वडील पंढरपुरास येऊन स्थायिक झाले होते व तेथेच नामदेवांचा जन्म झाला.

संत नामदेवांना बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागली आणि उत्तरोत्तर ती वाढतच गेली. शके १२१३ (इ. स. १२९१) मध्ये नामदेव व ज्ञानेश्वर यांची आळंदी येथे भेट झाली. ज्ञानेश्वरांच्या प्रभावामुळे नामदेवांच्या विशुद्ध भक्तीला अद्वैतबोधाचे अधिष्ठान लाभले. पुढे ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव औंढ्या- नागनाथास गेले आणि तेथे त्यांनी विसोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. त्यानंतर त्यांचे मन पूर्णपणे ईश्वरभक्तीकडे वळले व आपला सारा वेळ ते भजन-कीर्तनातच व्यतीत करू लागले.

भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य

संत नामदेवांनी ज्ञानेश्वर, सावता माळी, चोखामेळा इत्यादी संतांसमवेत तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा संत नामदेव तेथे उपस्थित होते. त्यानंतर संत नामदेवांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले. या वेळी त्यांनी थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली. त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना बहिणाबाई म्हणतात,

‘ज्ञानदेवें रचिला पाया ।
उभारिलें देवालया ||
नामा तयाचा किंकर ।
तेणे केला विस्तार ||
बहिणाबाई चौधरी

त्याकरिता त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. पंजाबात त्यांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. नामदेव हे दीर्घायुषी ठरले. वयाच्या ८१ व्या वर्षी म्हणजे शके १२७२ मध्ये ३ जुलै, १३५० रोजी त्यांनी पंढरपूर येथे देह ठेवला.

संत नामदेवांची-अभंग रचना

संत नामदेवांनी मराठीत विपुल अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगांच्या पाच छापील गाथा आज उपलब्ध आहेत. त्यांतील अभंगांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी भरते. परंतु त्यांतील सर्वच अभंग मूळ नामदेवांचे आहेत असे म्हणता येत नाही. त्यांच्या अभंगांचे आत्मचरित्रपर अभंग, ज्ञानेश्वरचरित्रपर अभंग आणि पारमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार पडतात.

मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंगरचना केली आहे. त्यांची सुमारे १२५ इतकी हिंदी पदे उपलब्ध आहेत. यांपैकी ६१ पदे शिखांच्या ‘ग्रंथसाहिब‘ या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती ‘नामदेवजी की मुखबानी‘ या नावाने ओळखली जातात.

भागवत धर्माचा विस्तार

नामदेव हे भागवत धर्माचे प्रसारक होते. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला तर नामदेवांनी त्याचा विस्तार केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतात अगदी पंजाबपर्यंत त्यांनी भागवत धर्माचा संदेश पोहोचविला. त्यांना पंजाबात व उत्तरेकडील इतरही प्रांतांत अनेक शिष्य मिळाले होते. अशा प्रकारे त्यांनी उत्तर भारतातदेखील आपली शिष्यपरंपरा निर्माण केली होती. पंजाबात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत; तसेच त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थाही आहेत.

साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती, हे नामदेवांच्या अभंगरचनांचे प्रमुख वैशिष्ट्य सांगितले जाते.

“तू माझी माऊली, मी गे तुझा तान्हा ।

पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे ॥”

यांसारख्या पंक्तींमधून प्रतीत होणारी त्यांची विशुद्ध आणि उत्कट भक्ती केवळ अपूर्व होय. उत्कट ईश्वरभक्तीचा विलोभनीय आविष्कार आपणास त्यांच्या अभंगांत जागोजागी पाहावयास मिळतो.

संत नामदेव यांच्या भक्तिमार्गाचे प्रतिपादन

संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेणते अशा सर्वांकरिता आहे. इतर सर्व साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थप्राप्तीचे एकमेव साधन होय, अशी त्यांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे, हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे.

संत नामदेवांच्या कार्याची महती

संत नामदेवांच्या काव्यासंबंधी शं. गो. तुळपुळे यांनी असे म्हटले आहे की, “नामदेवांची काव्यविषयक आत्मविस्मृती काही अपूर्व आहे. काव्यदृष्टी किंवा काव्यध्येय असे त्यांना नाहीच. एकमेकांस हिताच्या गोष्टी सांगून सावध करावे, विश्वाचे शोक-मोह निरसावे, हरिनामाचा महिमा गावा, भक्ती वाढवावी आणि हरिदासांना आकल्प आयुष्य व संतमंडळींस नाही.” सुख चिंतावे यापरता अन्य हेतू मनात ठेवून नामदेवांनी ग्रंथरचना केलेली.

संत नामदेवांच्या जीवितकार्याविषयी हे. वि. इनामदार म्हणतात, “संत नामदेव हे थोर भक्त होते; तसेच ते कुशल संघटकही होते. वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत तर केलेच; पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही पन्नास वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा ध्वज फडकविला. “

‘नामदेवांची गाथा’ हे ज्ञानेश्वरचरित्राचे एक महत्त्वाचे साधन असून ‘ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार’ म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो. नामदेवांचे स्वतःचे चरित्रही या गाथेमधून उलगडत गेले आहे; त्यामुळे आदि, समाधी आणि तीर्थावळी अशा तीन प्रकरणांतून त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले असून त्यांतील अभंगांची संख्या सुमारे साडेतीनशे इतकी आहे. हे अभंग म्हणजे चरित्रवाङ्मयाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

सॅम बहादूर यांची थोडक्यात माहिती AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार vivo v29 specifications marathi इस्रो ने शेअर केली आदित्य एल १ कडून आलेली पहिली माहिती