विष्णुबुवा ब्रह्मचारी माहिती मराठी | Vishnubuva Bramhachari Information in Marathi

google-news-icon

अल्प परिचय

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म १८२५ मध्ये कुलाबा (सध्याचे रायगड) जिल्ह्यातील शिरवली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवंगत झाले. वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी काही काळ विद्यार्जन केले; परंतु घरच्या गरिबीमुळे त्यांना फार काळ आपले शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांच्यावर भुसाऱ्याच्या दुकानापासून ते कस्टम खात्यापर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या नोकऱ्या करण्याचा प्रसंग आला.

लहानपणापासूनच त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता; त्यामुळे आपल्या नोकरीच्या काळातही विविध धार्मिक ग्रंथांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास चालू ठेवला होता. त्याच्या जोडीने कथा-कीर्तन, पुराण-प्रवचन, साधू, बैरागी, संन्यासी यांची संगत अशा गोष्टीत समाधान शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तथापि, यांपैकी कशातही स्वारस्य न वाटल्याने अखेरीस वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी सर्वसंगपरित्याग केला आणि आत्मसाक्षात्काराच्या तळमळीने ते अरण्यात निघून गेले.

विष्णुबुवांनी यानंतरचा काही काळ सद्‌गुरूचा शोध घेण्यात घालविला, परंतु याबाबतीत त्यांच्या पदरी निराशाच आली. अनेक साधुसंतांना ते शरण गेले आणि त्यांचा उपदेश घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांपैकी कोणीही त्यांच्या मनाचे समाधान करू शकले नाही. तेव्हा स्वतःच्या प्रयत्नांनीच आत्मप्राप्ती करून घेण्याचा त्यांनी निश्चय केला.

त्यानुसार ते सप्तशृंगीच्या डोंगरावर गेले आणि तेथे देवीच्या सान्निध्यात निव्वळ कंदमुळे खाऊन, वेदान्तविचार व ध्यानसाधना यांमध्ये सदैव निमन राहून त्यांनी घोर तपश्चर्या केली. याच ठिकाणी त्यांच्या अंगी तीव्र वेराम्य बाणले गेले. या वेळी ज्या आत्मसुखासाठी आपण साधना केली ते आत्मसुख आपणास प्राप्त झाल्याची त्यांची भावना झाली.

अर्थात, एवढ्याने काही विष्णुबुवांचे समाधान झाले नाही. उग्र तपश्चर्येच्या योगाने आपण स्वतःचे कल्याण साधले; पण या एका गोष्टीमुळे आपला कार्यभाग पुरा झाला असे होत नाही. जगाच्या कल्याणासाठी आपण आपले उर्वरित आयुष्य वेचले पाहिजे, अशी प्रेरणा त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. त्याच वेळी ‘पाखंड मतांचे खंडन करून तू वैदिक धर्माची पुन्हा स्थापना कर’ असा प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास आदेश दिला आहे, असे त्यांना वाटले आणि त्यानुसार ते आपल्या कार्यास लागले.

यानंतर विष्णुबुवा महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा निरनिराळ्या गावी गेले आणि वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाची छाप लोकांवर पडली. लवकरच त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. लोक त्यांना ‘ब्रह्मचारी बुवा’ या नावाने ओळखू लागले.

खिश्चन धर्माचे आक्रमण

सन १८५६ मध्ये विष्णुबुवा मुंबईस आले. त्या ठिकाणी त्यांना ख्रिस्ती धर्माने हिंदू धर्मावर चालविलेल्या आक्रमणाची जाणीव झाली. त्या काळी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी भारतीय लोकांत आपल्या धर्माचा प्रसार करण्याचे कार्य अतिशय पद्धतशीरपणे चालविले होते. आपल्या सेवाभावी वृत्तीने त्यांनी समाजातील अशिक्षित व कनिष्ठ जातीच्या लोकांवर छाप पाडून त्यांची मने जिंकून घेतली होती. त्याच वेळी ख्रिस्ती धर्मातील उदात्त व मानवतावादी तत्त्वांच्या आधारे येथील सुशिक्षितांनाही प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता.

ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या या दुहेरी आक्रमणामुळे हिंदू धर्मावर मोठेच संकट येऊ घातले होते. हिंदू धर्मातील सुशिक्षित वर्गावरदेखील पाश्चात्त्य आचार- विचारांचा प्रभाव पडू लागला होता. स्वधर्माविषयी एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होऊ लागला होता. अशा वेळी हिंदू धर्मावर येऊ घातलेले गंडांतर टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता विष्णुबुवा ब्रह्मचारींनी जाणली आणि ख्रिस्ती धर्माच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा त्यांनी निश्चय केला.

ख्रिस्ती धर्मप्रसारकांना उत्तर

ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या प्रचाराला उत्तर म्हणून विष्णुबुवांनी जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. या व्याख्यानांतून त्यांनी वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन करून त्याची श्रेष्ठता लोकांना पटवून दिली. आपल्या बिनतोड युक्तिवादाने स्वतःला नास्तिक म्हणविणाऱ्या कित्येक महात्म्यांची मने त्यांनी परत हिंदू धर्माकडे खेचून घेतली. त्यांच्या या व्याख्यानांना वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळाल्याने त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला झाला.

पुढे त्यांनी ख्रिस्ती धर्मोपदेशकांबरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी जाहीर वादविवादही केले. रेव्हरंड विल्सन या ख्रिस्ती धर्मोपदेशकाबरोबरचे त्यांचे वादविवाद विशेष गाजले. त्यांच्या विचारप्रवर्तक व्याख्यानमालेमुळे सामान्य लोकांत पुष्कळच जागृती निर्माण झाली. त्यांच्या व्याख्यानांचा यापेक्षाही महत्त्वाचा परिणाम असा झाला की, ख्रिस्ती धर्मप्रसारक हिंदू धर्माविरुद्ध जो बेजबाबदार प्रचार करीत होते त्यास बराच आळा बसला.

समाजसुधारणेचे प्रयत्न

विष्णुबुवा वैदिक धर्माचे अभिमानी असले तरी त्यांनी या ठिकाणच्या प्रचलित समाजरचनेतील दोषांकडे डोळेझाक केली नाही. प्रचलित जातिभेद हा वेदकालीन वर्णव्यवस्थेला सोडून आहे, या जातिभेदामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे हिंदी समाजाची अवनती झाली आहे, तेव्हा समाजाचा प्रत्येक घटक हा निदान सार्वजनिक जीवनात तरी सारख्याच दर्जाचा मानला जावा व त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ भाव असू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

सामाजिक सुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला होता, त्यांचे व्यक्तिगत आचरणही त्यांच्या सुधारणावादी विचारांना धरूनच होते, ते कोणाच्याही हातचे पाणी पीत असत व अन्न खात असत, खाण्यापिण्याच्या बाबतीत जातिपातीचे आणि स्पृश्यास्पृश्याचे बंधन त्यांनी कधीच पाळले नाही. त्यांचे चारित्र्य तर अतिशय शुद्ध होते. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे धैर्य त्यांच्या शत्रूनाही कधी झाले नाही.

सामाजिक विषमतेप्रमाणेच अतिशूद्रांवर होणाऱ्या अमानुष अन्यायाविरुद्धही विष्णुबुवांनी आवाज उठविला होता, आपल्या दलित बांधवांच्या मागासलेपणाची जबाबदारी सर्वस्वी उच्चवर्णीयांवरच आहे; म्हणून त्यांची अवहेलना न करता ब्राह्मणादिकांनी त्यांना समानतेच्या नात्याने वागवावे, त्यांच्या सांस्कृतिक सुधारणेसाठी कसोशीने झटावे व मंदिरप्रवेशादी त्यांचे न्याय्य हक्क सुखासमाधानाने मान्य करावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण इत्यादी सामाजिक प्रश्नांसंबंधीही त्यांचे विचार पूर्णपणे पुरोगामी होते आणि लोकांच्या स्तुतिनिंदेची पर्वा न करता त्यांनी ते निःसंदिग्ध शब्दांत व्यक्त केले होते. आपल्या समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व लोकभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे राजकीय विचार

या अध्यात्मप्रवण परंतु सुधारणावादी ब्रह्मचाऱ्याने सामाजिक समतेच्या संदर्भात त्या काळातही मांडलेले साम्यवादाच्या धर्तीवरचे विचार खरोखरच मननीय आहेत. विष्णुबुवांनी ‘वेदोक्तधर्मप्रकाश’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात राजनीतीसंबंधी एक स्वतंत्र प्रकरण आहे. पुढे त्यांनी त्यातील मतांचा विस्तार करून १८६७ मध्ये ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ हे पुस्तक लिहिले, त्यामध्ये त्यांनी मांडलेले विचार साम्यवादाशी बरेच मिळतेजुळते आहेत. या पुस्तकातील खालील उताऱ्यावरून त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल.

“याप्रमाणे सर्व प्रजा एक कुटुंब व सर्व जमीन हाच एक बाग व त्यातून जे जे निघेल ते ते सर्वांचे एक, याप्रमाणे राज्यव्यवस्था असली म्हणजे सर्वांना सर्व उपभोग मिळतात व सर्वांना उत्तम खावयास मिळते. यामुळे कोणास काही प्राप्त होत नाही असे होतच नाही. म्हणून सर्व लोक पूर्णकाम होतात. सर्व प्रजेकडून सर्व जमिनीची लागवड करावी आणि अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न उत्पन्न करून गावोगाव कोठारे भरून ठेवावीत. त्यातून सर्व गावकऱ्यांनी पोटास लागेल तितके अन्न न्यावे.

याप्रमाणे बाराही महिन्यांत एकसारखे सर्व जमिनीतून उत्पन्न घ्यावे आणि ते सर्वांचे उत्पन्न एकच व एकाचेच ताब्यात राहून त्यातून खावयास विपुल न्यावे. सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगे व मुली राजाच्या ताब्यात द्यावीत. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकवून ज्याला ज्या कामात जास्ती उद्योग करण्याची सवड असेल त्याला त्या कामाकडे लावून द्यावे.”

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या वरील विचारांवरून त्यांनी एक प्रकारे साम्यवादाचाच पुरस्कार केला होता असे म्हणावे लागते. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांना ‘कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक’ असे म्हटले आहे. अर्थात, बुवांचे हे विचार कार्ल मार्क्स वाचून बनलेले नाहीत, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे डोळसपणे अवलोकन केल्यानंतर स्फुरलेले आहेत. यावरून त्यांची बौद्धिक झेप व द्रष्टेपण प्रत्ययास येते.

मृत्यू – १८ फेब्रुवारी, १८७१.

ग्रंथसंपदा

भावार्थसिंधु, वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहजस्थितीचा निबंध, चतुःश्लोकी श्रीमद्भागवताचा मराठी भाषेत अर्थ, बोधसागररहस्य, सेतूबंधनी टीका इत्यादी.

Leave a Comment