लोकमान्य टिळक संपूर्ण माहिती मराठीत | Lokmanya Tilak Information in Marathi

google-news-icon
जन्म २३ जुलै १८५६
जन्मगाव रत्नागिरी
वडिलांचे नाव गंगाधर टिळक
शिक्षण एलएलबी फर्ग्युसन कॉलेजमधून
पत्नी सत्यभामाबाई टिळक
अपत्य श्रीधर, विश्वनाथ, रामभाऊ
मृत्यू १ ऑगस्ट १९२०

“हल्लीच्या काळी त्यांच्याइतका लोकोत्तर पुरुष कोणीच झाला नाही. कदाचित गांधी त्यांच्या बरोबरीला येतील; पण बुद्धिमत्ता व राजकारणातील मार्मिकता हे टिळकांच्या अंगी अधिक प्रमाणात वसत होते. ” -सर व्हॅलेंटीन चिरोल

लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी गटाचे प्रमुख नेते होते. हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. ‘हिंदी असंतोषाचे जनक‘ म्हणूनही त्यांना संबोधण्यात आले होते.

लोकमान्य टिळकांचा- परिचय

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव. अर्थात, त्यांचा जन्म मात्र रत्नागिरीचाच. चिखली किंवा चिखलगावचा नव्हे! तसा उल्लेख कोठे असला तर तो चुकीचा होय. त्यांचे मूळ नाव ‘केशव’ असे होते; पण ‘बाळ’ हे टोपणनावच कायम झाले. त्यांचे वडील गंगाधरपंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली; त्यामुळे टिळकांचे बहुतेक शिक्षण पुणे येथेच झाले.

सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल्एल्.बी. झाले. टिळक एल्एल्. बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला.

मराठा व केसरी वृत्तपत्रे

विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकआगरकर यांनी १ जानेवारी, १८८० रोजी पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल‘ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा‘ (२ जानेवारी, १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी‘ (४ जानेवारी, १८८१) ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर, १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी‘ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज‘ सुरू करण्यात आले.

यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले; त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर, १८८७ रोजी ‘केसरी’ च्या संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’ चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्राद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले.

लोकमान्य टिळकांचे-राजकीय कार्य

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी काँग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोकजागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने चालू ठेवले होते. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी‘ उत्सव’ १५ एप्रिल, १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.

लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरून काँग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी‘ व ‘जहालमतवादी‘ असे दोन गट पडले. त्यांतील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते.

सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटांतील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची काँग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून, १९०८ रोजी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.

या सहा वर्षांच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून, १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधिक संस्था अधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे, १९१६ रोजी लोकमान्य टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीग‘ची (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग‘ची स्थापना केली.) (लोकमान्य टिळकांची होमरूल लीग आणि अॅनी बेझंट यांची होमरूल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या; परंतु टिळक आणि अॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनांमध्ये परस्पर समन्वय होता इतकेच; हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.)

इंग्रज सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणांविरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत.

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा खडा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सरकारी अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतिशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टीकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर, १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यावर त्याविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत ‘करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.

लोकमान्य टिळकांचे-राजकीय विचार

लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती, सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद‘ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यानी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले होते.

लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणस्वराज्य या ‘चतुःसूत्री कार्यक्रमा‘चा पुरस्कार केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच,’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. जनसामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडलेले हे उद्गार टिळकांनी नेमके कोठे काढले, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आढळतात. लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग किंवा स्वराज्य संघाची स्थापना मे, १९१६ मध्ये बेळगाव येथे केली असल्याने त्यांनी वरील घोषणा बेळगाव येथे केली हे मत अधिक ग्राह्य वाटते. स्वराज्य हे लोकमान्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता.

https://youtu.be/XmIigAOQl7Q?si=_WmyXQqVeDhV8q6Z अजून माहितीसाठी हा विडियो पाहू शकता.

खरे तर, लोकमान्य टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी गीतारहस्य, ओरायन, दी आर्क्टिक होम इन दी वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले होते.

समाजसुधारणेविषयीचे विचार

लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहालमतवादी भूमिका घेतली होती; परंतु समाजसुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहीसे नेमस्त होते. म्हणूनच यासंबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते.

समाजसुधारणेबाबत लोकमान्य टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येतील; परंतु जर आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकर्त्यांना आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल.

लोकमान्य टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती वय विधेयकाला विरोध करताना, या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापुरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नांबाबत टिळकांनी समाजसुधारकांना विरोध केला होता.

अर्थात, लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजाविली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले.

या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले; म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक‘ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.

मृत्यू – १ ऑगस्ट, १९२०.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment