पंडिता रमाबाई यांची संपूर्ण माहिती मराठी | Pandita Ramabai Information in Marathi

google-news-icon
जन्म २३ एप्रिल, १८५८
जन्मगाव कर्नाटकातील गंगामूळ
वडीलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे
आईचे नाव लक्ष्मीबाई
भाऊ श्रीनिवास
पतीचे नाव बाबू विपिन बिहारीदास मेधावी
अपत्य मनोरमा
कार्य विधवा, अनाथ, लहान मुली यांचे शिक्षण
मृत्यू ५ एप्रिल १९२२

पंडिता रमाबाई-अल्प परिचय

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात ज्या काही विद्वान व कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या त्यांमध्ये पंडिता रमाबाई यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्या काळात स्त्रियांच्या कर्तबगारीला समाजात फारच थोडा वाव मिळत असे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पंडिता रमाबाईंनी आपली बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर अलौकिक कामगिरी करून दाखविली होती.

पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल, १८५८ रोजी कर्नाटकातील गंगामूळ येथे एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. अनंतशास्त्री डोंगरे हे वेदशास्त्र संपन्न होते, तसेच ते संस्कृत भाषेचे गाढे व्यासंगी होते. मंगळूर जिल्ह्यातील माळहेरंजी हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई हिला शिकविले. साहजिकच, त्या वेळच्या समाजाला त्यांची ही कृती फारशी रुचली नाही. आजुबाजूच्या लोकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली; त्यामुळे अनंतशास्त्रींनी आपले मूळ गाव सोडले आणि ते आपल्या पत्नीसह गंगामूळ येथे येऊन राहिले. तेथेच पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला.

अनंतशास्त्रींनी आपल्या दोन मुलांना पंडिता रमाबाई व श्रीनिवास यांना संस्कृत व प्राचीन हिंदू शास्त्रे यांचे उत्तम शिक्षण दिले, त्यांनी आपल्या पत्नीसही संस्कृत शिकविले होते; त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष्मीबाई यांनीही लक्ष पुरविले होते. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाईंनी अगदी लहान वयातच अनेक विद्या आत्मसात केल्या. त्यांची बुद्धी तल्लख होती; त्यामुळे त्यांनी अनेक ग्रंथ मुखोद्गत केले. त्या संस्कृत भाषेतही पारंगत झाल्या. वेद व इतर हिंदू धर्मग्रंथ यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले.

पंडिता रमाबाईच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. माता- पित्यांच्या मृत्यूमुळे पोरक्या झालेल्या रमाबाई व श्रीनिवास या बहीण-भावंडांनी आपला मुख सोडला आणि दोघेही तीर्थयात्रेस निघाले. पुढील सुमारे सहा वर्षे त्यांनी सर्व हिंदुस्थानात संचार केला. या कालावधीत त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अनेक प्रकारच्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. काही वेळा तर अगदी उपासमारीची पाळीही त्यांच्यावर आली; पण या सर्व प्रकारच्या संकटांशी मुकाबला करत त्यांनी आपली भ्रमंती चालूच ठेवली. याप्रमाणे संपूर्ण देशात संचार करीत पंडिता रमाबाई आपला भाऊ श्रीनिवास याच्यासमवेत १८७८ मध्ये कोलकाता येथे येऊन पोहोचल्या.

कोलकाता येथील वास्तव्यातच रमाबाईंना व्यापक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या पांडित्याने आणि संस्कृत भाषेच्या ज्ञानाने मोठमोठ्या विद्वान पंडितांना थक्क करून सोडले. कोलकात्यातील विद्सवत्सभेने त्यांचा जाहीर सन्मान केला व त्यांना ‘सरस्वती’ व ‘पंडिता’ या पदव्यांनी गौरविले. त्या वेळेपासून त्या पंडिता रमाबाई’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांची कीर्ती लवकरच सर्व हिंदुस्थानात पसरली.

कोलकात्यातील वास्तव्याच्या काळातच १३ ऑक्टोबर, १८८० रोजी पंडिता रमाबाईचा बाबू विपिन बिहारीदास मेधावी या ब्राह्मो समाजिस्ट वकिलाशी विवाह झाला. त्या काळात हा विवाह खूपच गाजला; कारण रमाबाई जातीने ब्राह्मण होत्या, तर बिपिन बिहारी दास हे शुद्र समजल्या जाणाऱ्या जातीत मोडत होते. पण दोघेही पुरोगामी विचाराचे असल्याने विवाहाच्या संदर्भात जातीचा विचार करण्याची त्यांना गरज वाटली नाही. लवकरच त्यांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव मनोरमा असे ठेवले. तथापि, रमाबाईना संसारसुख फार काळ लाभले नाही. ४ फेब्रुवारी, १८८२ रोजी त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. त्याअगोदर १५ मे, १८८० रोजी त्यांचा भाऊ श्रीनिवास याचेही निधन झाले होते. भाऊ व पती यांच्या निधनाने रमाबाई एकाकी पडल्या.

पतिनिधनानंतर लवकरच रमाबाई महाराष्ट्रात पुणे येथे आल्या. तेथेही त्यांनी आपल्या विद्वत्तेची छाप पुणेकर विद्वानांवर पाडली. पंडिता रमाबाईनी १ मे, १८८२ रोजी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली व त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबाबत लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचे कार्यही हाती घेतले. ज्या देशात स्त्रियांची स्थिती सुधारते त्याच देशाची एकंदर स्थिती सुधारते, असे सांगून, आपल्या देशाची उन्नती व्हावयाची असेल तर येथील स्त्रियांच्या स्थितीत प्रथम सुधारणा घडवून आणली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. या सुमारास भारतातील शिक्षणविषयक प्रश्नाचा विचार करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली होती. या हंटर कमिशनपुढे साक्ष देताना पंडिता रमाबाईनी स्त्री-शिक्षणाच्या आवश्यकतेसंबंधी आपली आग्रही मते मांडली होती.

इंग्लंडला प्रयाण व पुन्हा भारतात

पुण्यातील वास्तव्यात रमाबाई ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्या. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या साहाय्यामुळे पंडिता रमाबाईंना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. एप्रिल, १८८३ ते फेब्रुवारी, १८८९ अशी जवळजवळ सहा वर्षे पंडिता रमाबाई परदेशात होत्या. इंग्लंडमध्ये असताना खिस्ती धर्मातील मानवतावादी तत्त्वांविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. ख्रिस्ती धर्माच्या मिशनऱ्यांच्या ठायी असलेल्या सेवाभावी वृत्तीनेही त्या प्रभावित झाल्या.

त्यातूनच रमाबाईंनी सप्टेंबर, १८८३ मध्ये आपल्या मुलीसह ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. इंग्लंडमधील एका महाविद्यालयात त्यांनी संस्कृतच्या अध्यापिका म्हणूनही काम केले. तेथून पुढे त्या अमेरिकेला गेल्या. त्या ठिकाणी एका ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी आपले नाव दाखल केले आणि तेथील शिक्षण पद्धतीची माहिती करून घेतली. अमेरिकेतून भारतात परतल्यावर रमाबाईंनी स्त्री-शिक्षणाच्या कार्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. १८९८ मध्ये त्या दुसऱ्यांदा अमेरिकेला गेल्या. ५ एप्रिल, १९२२ रोजी त्यांचे केडगाव येथे निधन झाले.

“शारदा सदन’ची स्थापना

पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी केलेले महत्त्वाचे कार्य म्हणून शारदा सदनच्या स्थापनेचा उल्लेख करता येईल. आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात बाईंनी स्वतःच्या विद्वत्तेची अमेरिकन लोकांवरही छाप पाडली होती. त्यांनी अमेरिकेत ठिकठिकाणी व्याख्यान देऊन भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निधी गोळा केला. तेथील मिशनऱ्यांनी देखील रमाबाईंना असे आश्वासन दिले की, त्यांनी हिंदुस्थानात जाऊन स्त्री-शिक्षणाचे कार्य हाती घेतल्यास आपण दहा वर्षांपर्यंत त्या कार्याला आर्थिक साहाय्य देऊ.

तेव्हा भारतात परत आल्यावर पंडिता रमाबाईंनी ११ मार्च, १८८९ रोजी मुंबई येथे “शारदा सदन’ नावाची एक संस्था स्थापना केली. या संस्थेत निराश्रित विधवा व अनाथ स्त्रिया यांच्या राहण्या-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती; तसेच या स्त्रियांच्या शिक्षणाची सोयदेखील तेथे करण्यात आली होती. पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना आजवर सुखाचा साधा शब्दही मिळत नव्हता अशा अनाथ व विधवांना पंडिता रमाबाईनी ‘शारदा सदनात खरे प्रेम व आपुलकी यांचा प्रत्यय आणून दिला.

गंगाधरपंत गद्रे यांची कन्या कु. शारदा ही या सदनाची पहिली विद्यार्थिनी. तिच्या नावावरूनच या सदनास ‘शारदा सदन’ हे नाव ठेवले गेले. बाळकृष्ण व मनोरमाबाई या जोशी दाम्पत्याची कन्या गोदूताई (नंतरच्या सौ. आनंदीबाई तथा बाया कर्वे) या सदनाच्या पहिल्या विधवा विद्यार्थिनी होत. मुंबईत ‘शारदा सदन’ ला पुरेशा विद्यार्थिनी मिळू शकल्या नाहीत, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो काळ विधवांच्या शिक्षणास फारसा अनुकूल नव्हता. पुढे १ नोव्हेंबर, १८९० रोजी पंडिता रमाबाईनी आपली ही संस्था मुंबईहून पुण्यास हलविली. त्या ठिकाणी मात्र त्यांची संस्था चांगलीच नावारूपाला आली.

पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असला तरी त्यांनी चालविलेल्या संस्थेला अनेक हिंदू नेत्यांचा पाठिंबा होता. ‘शारदा सदन’च्या सल्लागार मंडळात न्या. रानडे, न्या. तेलंग, डॉ. भांडारकर यांसारख्या मान्यवर व्यक्तीचा समावेश होता. पण ‘शारदा सदन’ ही ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था आहे; या संस्थेतील मुलींना ख्रिस्ती धर्माचे शिक्षण देण्यात येते, असा गवगवा होऊ लागला. त्यामुळे न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांनी ‘शारदा सदन’शी असलेले आपले संबंध तोडून टाकले.

पंडिता रमाबाईंचे केडगावचे ‘मुक्तिसदन’

यानंतर रमाबाईनी १८९७ मध्ये पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या केडगाव या गावी जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर आपली स्वतंत्र वसाहत उभी केली. याच ठिकाणी त्यांनी २४ सप्टेंबर १८९८ रोजी ‘मुक्तिसदन’ नावाची संस्था स्थापन केली. ‘शारदा सदन’ प्रमाणेच ‘मुक्तिसदनातही अनाथ मुली व विधवा स्त्रिया यांच्या राहण्या-जेवण्याची तसेच शिक्षणाची मोफत सोय करण्यात आली होती.

त्या ठिकाणी कोणत्याही जातीच्या, गरीब, अपंग, निराश्रित, विधवा, पतित अशा स्त्रियांना मुक्त प्रवेश होता. अशा स्त्रियांविषयी रमाबाईना अत्यंत कळवळा वाटत असे. अनाथस्त्रियांचा उद्धार हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले होते. त्यासाठी त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. पण आपल्या संस्थेतील मुली व अनाथ स्त्रिया यांना ख्रिस्ती धर्मात ओढण्यासाठी रमाबाई प्रयत्नशील असतात, असा प्रचार त्यांच्याविरुद्ध करण्यात आला. त्यामुळेच येथील हिंदू लोकांमध्ये त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक निर्माण झाले.

पंडिता रमाबाईंचे दुष्काळातील कार्य

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट वारंवार कोसळत होते. अशा दुष्काळात सापडलेल्या लोकांचे अतोनात हाल होत असत. त्यांपैकी अनेक जणांवर उपासमारीने तडफडून मरण्याचे प्रसंग ओढवत असत. पंडिता रमाबाईनी अशा असंख्य गोरगरीब माणसांना दुष्काळात मदतीचा हात दिला. सन १८९७ च्या दुष्काळात त्यांनी गरिबांना मदत तर केलीच; पण दुष्काळामुळे निराधार झालेल्या मुली व स्त्रिया यांना आपल्या संस्थेत आश्रय देऊन त्यांचे प्राण वाचविले.

पंडिता रमाबाईंनी त्या काळात स्त्री-शिक्षणाचे केलेले कार्य अत्यंत मोलाचे समजले पाहिजे. एका स्त्रीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत हे कार्य यशस्वीपणे पार पाडले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद ठरते. त्या खऱ्या अर्थाने मानवतावादी होत्या. म्हणूनच विधवा, अनाथ व पतित स्त्रियांवर मायेची पाखर घालण्यास त्या पुढे आल्या आणि आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी याच कार्याला सर्वस्वी वाहून घेतले.

पंडिता रमाबाईंनी लिहिलेले पुस्तक

रमाबाईनी बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर केले होते. याशिवाय स्त्रीधर्म नीती, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवासवृत्त, दी हाय कास्ट हिंदू वुमन इत्यादी पुस्तकेही त्यांनी लिहिली होती.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार Hottest Exoplanet Ever Found Could Reveal Secrets of Planetary Atmospheres New Android Malware DogeRAT Targets Indian Users Dark Web Marathi