वि. स. खांडेकर यांची माहिती मराठी | V S Khandekar Information in Marathi

google-news-icon

वि. स. खांडेकर यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली. जाते. त्यांनी कादंबरी, कविता, कथा, लघुनिबंध, चित्रपट-कथा, नाटक इत्यादी अनेक वाङ्मयप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकारांपैकी ते एक होत.

वि. स. खांडेकर यांचा परिचय

वि. स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ रोजी सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. सन १९१३ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले. इंटर झाल्यानंतर खेड्यात जाऊन निरपेक्ष वृत्तीने शिक्षणकार्य करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ते कोकणातील शिरोडे या गावी गेले आणि तेथील इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली.

पुढे ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक बनले. शिरोड्याला असतानाच त्यांनी आपल्या लेखनकार्याला सुरुवात केली. शिरोड्याच्या शाळेत सतरा-अठरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९३८ मध्ये खांडेकर चित्रपट व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरला वास्तव्यासाठी आले. पुढे कोल्हापुरातच ते कायमचे स्थायिक झाले.

वि. स. खांडेकर यांचे साहित्य

वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यसेवेचा प्रारंभ कथालेखनापासून केला. त्यांनी अनेक लघुकथा व रूपककथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लघुकथा अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या असून त्यांना मोठेच वाङ्मयीन मूल्य लाभले आहे; पण खांडेकरांना अमाप लोकप्रियता मिळाली ती कादंबरीकार म्हणूनच. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यापाठोपाठ एकापेक्षा एक सरस अशा सुमारे पंधरा कादंबऱ्या त्यांनी मराठी रसिकांना सादर केल्या. वाचकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. खांडेकरांच्या अनेक कादंबऱ्यांची निरनिराळ्या भारतीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

स्वैर कल्पनाविलास, उपमा-उत्प्रेक्षा इत्यादी अलंकारांचे प्राचुर्य, कोटीबाज भाषा, माधुर्य, मानवतावादी भूमिका ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. अलंकारिक लेखनाबद्दल त्याची विशेष ख्याती आहे. त्यांची अलंकारिक भाषा लक्षात घेता त्यांच्या कादंबऱ्यातील निरनिराळ्या पात्रांच्या मुखामधून स्वतः खांडेकरच बोलतात असे वाटते.

वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले लघुनिबंधही बरेच लोकप्रिय झाले आहेत. मराठी लघुनिबंधांचा जनक कोण, असा एक वाद साहित्याच्या क्षेत्रात असून त्या संदर्भात ना. सी. फडके यांच्या जोडीने वि. स. खांडेकर यांचेही नाव घेतले जाते. यावरून त्या बाबतीतील त्यांचा अधिकार स्पष्ट होतो. खांडेकरांनी छाया, ज्वाला, देवता, अमृत, माझ बाळ इत्यादी अकरा चित्रपटांच्या कथा लिहिल्या असून त्यांपैकी बहुतेक चित्रपट त्या काळी खूपच गाजले होते. याशिवाय समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. अशा रीतीने वि. स. खांडेकर यांनी विविध अंगांनी मातृभाषेची सेवा केली आहे आणि त्यायोगे त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

जीवनवादी साहित्यिक

वि. स. खांडेकर हे जीवनवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘जीवनासाठी कला’ हा साहित्यातील पक्ष त्यांनी उचलून धरला होता. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतून सर्वसामान्यांच्या सुखदुःखांना त्यांनी वाचा फोडली आहे. त्यातून त्यांच्या ध्येयवादी वृत्तीचे दर्शन आपणास घडते. मानवी जीवनाविषयी अपार प्रेम आणि मानवतावादी दृष्टिकोन या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातही उमटले आहे.

वि. स. खांडेकर यांना मिळालेले पुरस्कार

वि. स. खांडेकर यांना अनेक मानसन्मान लाभले होते. ते साहित्य अकादमीचे फेलो होते. १९४१ मध्ये सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारने १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय ज्ञानपीठातर्फे त्यांना त्यांच्या ‘ययाती’ या साहित्यकृतीबद्दल १९७४ च्या ज्ञानपीठ पारितोषिकाने अलंकृत करण्यात आले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान केली होती.

२ सप्टेंबर, १९७६ रोजी मिरज (सांगली) येथे निधन.

वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले नाटक, कादंबऱ्या, लघुनिबंध इ.

वि. स. खांडेकर यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे अनेक ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे- हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफा, दोन मने, क्रौंचवध, अश्रू, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, दोन ध्रुव, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कादंबऱ्या. कालची स्वप्ने, नवा प्रातःकाल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला, स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पलता इत्यादी लघुनिबंधसंग्रह. याशिवाय काही रूपककथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता, ‘रंकाचे राज्य’ हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ यांचाही त्यांच्या साहित्यात समावेश होतो.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment