महर्षी धोंडो केशव कर्वे संपूर्ण माहिती मराठी | Dhondo Keshav Karve Information in Marathi

google-news-icon
जन्म १८ एप्रिल १८५८
जन्मगाव शेरवली जि रत्नागिरी
शिक्षण बी ए उत्तीर्ण
नोकरी गणिताचे प्राध्यापक (सुरुवातीच्या काळात)
पत्नी आनंदीबाई (दुसरी पत्नी)
समाजकार्य स्त्री शिक्षण
विधवा सबळीकरण
विधवा पुनर्विवाह
मृत्यू ९ नोव्हेंबर १९६२

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था

विधवा विवाहोत्तेजक मंडळी
अनाथ बालिकाश्रम मंडळी
हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था
निष्काम कर्म-मठ
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
समता संघा

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा परिचय

भारतात स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्या महापुरुयांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. अशा महापुरुषांपैकी महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या आजोळच्या गावी १८ एप्रिल, १८५८ रोजी झाला. त्यांचे गाव कोकणातील मुरुड हे होय. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती; त्यामुळे त्यांना खडतर परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागले.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. त्या ठिकाणी शिकवण्या करून त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. सन १८८१ मध्ये ते मट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रथम मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला; पण पुढे ते एलफिन्स्टन कॉलेजात दाखल झाले. त्यातून १८८४ मध्ये गणित हा विषय घेऊन ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुंबईत मुलींच्या हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुढे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निमंत्रणावरून १५ नोव्हेंबर, १८९१ रोजी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सन १८९२ मध्ये ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले. यापुढील काळात त्यांनी पुणे हीच आपली कर्मभूमी बनविली, फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी १५ नोव्हेंबर, १८९१ ते १९९४ अशी सुमारे तेवीस वर्षे सेवा केली.

महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उदारासाठी केलेले कार्य सर्वपरिचित आहे, स्त्री- शिक्षणासाठी त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले होते. आपल्या समाजातील स्त्रियांची दुःस्थिती पाहून समाजाच्या या घटकासाठी काहीतरी केले पाहिजे, असे विचार त्यांच्या मनात आले आणि त्या वेळेपासून त्यांच्या जीवनाचे तेच एकमेव उद्दिष्ट बनले. समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्था वाढीस लावण्यासाठी आपले तन-मन-धन खर्ची घातले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या या कार्यामुळे त्यांचे नाव स्त्री उद्धाराच्या कार्याशी कायमचे निगडित झाले आहे. वयाच्या एकशेपाचाव्या वर्षी ९ नोव्हेंबर १९६२ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

विधवा विवाहाचा पुरस्कार

कर्त्यांच्या काळात, विशेषतः एकोणिसाव्या शतकात येथील समाजात विधवा स्त्रियांची संख्या बरीच मोठी होती. बालविवाहाची असलेली प्रथा आणि बालमृत्यूचे मोठे प्रमाण ही त्याची प्रमुख कारणे होती. या दुर्दैवी स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय बनली होती. समाजात तर त्यांना काही स्थान नव्हतेच; पण त्यांच्या घरची माणसेदेखील त्यांना अत्यंत वाईट वागणूक देत असत. संसार म्हणजे काय, याची पुरती जाणीवही ज्यांना झालेली नाही अशा अजाण बालकांवरही विधवे जीवन जगण्याचा दुर्धर प्रसंग ओढवल्याचे चित्र समाजात त्या काळी नेहमीच दृष्टीस पडत असे. त्यांना आपले उभे आयुष्य अतिशय दुःखात व सर्व प्रकारच्या हालअपेष्टांना तोंड देत कंठावे लागत असे.

समाजातील विधवा स्त्रियांचे दुःख दूर करणे गरजेचे आहे, असे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटले. त्यासाठी त्यांनी विधवाविवाहाचा आग्रहाने पुरस्कार केला. विधवाविवाहाला चालना मिळावी म्हणून ३१ डिसेंबर १८९३ रोजी त्यांनी ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी‘ या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून या प्रश्नावर समाजात जागृती पडवून आणण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. कालांतराने २० ऑगस्ट, १८९५ रोजी या संस्थेच्या ‘विधवा विवाहोतेजक मंडळी‘ या नावात बदल करण्यात येऊन ‘विधवा- विवाह प्रतिबंध निवारक मंडळी‘ असे नवे नामकरण केले गेले.

उक्तीप्रमाणे कृती

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार तर केलाच; पण स्वतः च्या उदाहरणानेच त्यासंबंधीचा आदर्श समाजाला घालून दिला. ते पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचा प्रथम विवाह झाला होता. पण त्यांची प्रथम पत्नी त्यांच्या वयाच्या एकतिसाव्या वर्षी मृत्यू पावली. त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे या वयातही त्यांना एखाद्या कुमारिकेशी विवाह करता आला असता; पण कर्व्यांची विधवांच्या समस्या सोडविण्याबाबतची तळमळ अंतःकरणापासूनची होती.

आपल्या मतांशी ते प्रामाणिक व एकनिष्ठ होते. म्हणूनच दुसऱ्या विवाहाचा विचार करण्याचा प्रसंग जेव्हा त्यांच्यावर आला तेव्हा एका विधवेशी विवाह करण्याचे धैर्य त्यांनी प्रकट केले. १९ मार्च, १८९३ रोजी त्यांनी मनोरमाबाई व बाळकृष्ण या जोशी दाम्पत्याच्या गोदुताई नावाच्या विधवा कन्येशी विवाह केला, पंडिता रमाबाईच्याशारदा सदन‘ मधील ही पहिली विधवा विद्यार्थिनी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेल्या आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे होत. या विवाहामुळे कर्व्यांना समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला. सर्वांनी त्यांची अवहेलना केली. अगदी जवळच्या नातेवाइकांनीदेखील त्यांच्याशी असलेले आपले संबंध तोडून टाकले; पण कर्व्यांनी मात्र आपल्या मनाचा तोल कधी ढळू दिला नाही.

अनाथ बालिकाश्रम मंडळी

समाजात विधवा स्त्रियांना जी दुःखे भोगावी लागत होती, ती दूर करण्याच्या उद्देशाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १४ जून १८९६ रोजी पुणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम मंडळी‘ नावाची संस्था स्थापन केली. तथापि, आश्रमाच्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती १ जानेवारी, १८९९ पासून. (त्यामुळेच अनेक ठिकाणी स्थापना वर्ष १८९९ दिले जाते; पण ते चूक होय.) पुढच्याच वर्षी म्हणजे जून, १९०० मध्ये ही संस्था पुण्याहून जवळच्याच हिंगणे या गावी स्थलांतरित करण्यात आली.

विधवा स्त्रियांना स्वावलंबी बनवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या संस्थेचा उद्देश होता. अनाथ बालिकाश्रमासंबंधी स्वतः कर्वे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे- ‘आश्रमापासून झालेला सर्वात मोठा फायदा म्हटला म्हणजे खुद्द विधवांच्या अंतःकरणात त्याने जो आशेचा अंकुर उत्पन्न केला तो होय. हिंदूंच्या ज्या जातीत विधवाविवाह रूढ नाही, त्या जातीतील अल्पवयस्क विधवांना शिक्षण देऊन, त्यांची मने सुशिक्षित करून, त्यांना स्वावलंबी होता येईल असे साधन त्यांना हस्तगत करून देणे व आपले जीवित उपयोगी असून ते कोणत्या तरी कार्याला लावता येईल असा विश्वास त्यांच्यामध्ये उत्पन्न करणे, हे आश्रमाचे उद्देश आहेत व ते चांगल्या रीतीने तडीला जात आहेत.’

पुढे सन १९४६ मध्ये ‘अनाथ बालिकाश्रम मंडळी‘ या संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. याच वर्षी संस्थेचे ‘हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था‘ असे नामकरण केले गेले. सध्या ही संस्था ‘महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था‘ म्हणून ओळखली जाते.

महिला विद्यालय

स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल आणि त्यांच्या स्वभावाला पोषक ठरेल अशा प्रकारचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ४ मार्च, १९०७ रोजी पुणे येथे ‘महिला विद्यालया‘ची स्थापना केली. डिसेंबर, १९११ मध्ये महिला विद्यालयाचेही हिंगणे येथे स्थलांतर केले गेले. या विद्यालयात गृहजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपनशास्त्र यांसारखे विषय शिकविण्याची सोय करण्यात आली. पुढे ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी कर्व्यांनी ‘निष्काम कर्म-मठा‘ची स्थापना केली. जून, १९१७ मध्ये त्यांनी अध्यापिका विद्यालय सुरू केले, तर एप्रिल, १९१८ मध्ये पुणे येथे कन्याशाळेची स्थापना केली.

निष्काम कर्म-मठ

४ नोव्हेंबर, १९०८ रोजी कर्व्यांनी ‘निष्काम कर्म-मठ‘ या संस्थेची स्थापना केली. स्त्रियांच्या उद्धाराचे आणि त्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थांचे कार्य निःस्वार्थीपणे व त्यागी वृत्तीने करणारे समाजसेवक तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या संस्थेची स्थापना केली होती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरता, ध्येयवादाने व निःस्वार्थी बुद्धीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करूनच समाजसेवेचे, विशेषतः स्त्री-समाजाच्या सेवेचे कार्य चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल, असा त्यांचा विश्वास होता.

महिला विद्यापीठ

स्त्रियांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची इच्छा होती. त्यानुसार ३ जून, १९१६ रोजी त्यांनी हिंगणे येथे ‘महिला विद्यापीठा‘ची स्थापना केली. स्त्रियांच्या शिक्षणात त्या काळी इंग्रजी माध्यमाचा विशेष अडसर येत होता. म्हणून महिला विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे असे ठरविण्यात आले. तथापि, इंग्रजी भाषेला असलेले महत्त्व विचारात घेऊन इंग्रजीच्या अध्यापनाचीही सोय करण्यात आली होती. स्त्री-जीवनाला उपयुक्त ठरतील आणि स्त्रियांच्या भावी विकासाला पोषक होतील अशा गृहजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र इत्यादी विषयांचा आवश्यक विषय म्हणून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला होता. तसेच ललित कलांना ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले होते.

महिला विद्यापीठात पदवी परीक्षेशिवाय माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहविज्ञान पदवी, परिचारिका पदवी यांसारखे खास अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले होते. सन १९२० मध्ये शेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ १५ लाख रुपयांची देणगी या विद्यापीठाला दिली; त्यामुळे विद्यापीठाला चांगलेच आर्थिक स्थैर्य लाभले. पुढे या विद्यापीठाचे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा‘त (SNDT) रूपांतर झाले. सन १९४९ मध्ये श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ कायदा संमत झाला आणि १९५१ मध्ये या विद्यापीठास विद्यापीठ म्हणून मान्यता प्राप्त झाली. या विद्यापीठाला जोडलेल्या महाविद्यालयांची संख्या सतत वाढत चालली असून त्यांमधून हजारो स्त्रिया उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

ग्रामशिक्षण मंडळाची स्थापना

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी १९३६ मध्ये ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ‘ या संस्थेची स्थापना केली. भारतीय समाजातील जातिभेद व अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांनाही त्यांचा विरोध होता. या प्रथांचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी १९४४ मध्ये ‘समता संघा‘ची स्थापना केली होती.

मूल्यमापन

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या वरील कार्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात स्त्री-शिक्षणाच्या प्रसारात त्यांचा वाटा किती महत्त्वपूर्ण होता याची कल्पना येते. त्यांनी आपल्या स्त्री-उद्धाराच्या कार्याचा प्रारंभ विधवा स्त्रियांपासून केला होता. या स्त्रियांची समाजातील स्थिती सुधारावी व त्यांना चांगल्या प्रकारचे जीवन जगण्याची संधी मिळावी, असा विचार त्यांनी केला होता. परंतु स्त्रियांना शिक्षणाचा लाभ मिळून त्या स्वावलंबी बनल्याखेरीज त्यांचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या प्रसारावर आपले लक्ष केंद्रित केले.

त्यांच्या या कार्याचे महत्त्व असे, की ज्या काळात समाजात स्त्रियांची उपेक्षाच केली जात होती त्या काळात त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली आणि स्त्रियांना समाजात सन्मानाने जगणे शक्य व्हावे अशी परिस्थिती निर्माण करण्यास आपल्या परीने हातभार लावला, त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील स्त्री-शिक्षणाची आणि स्त्रीच्या सर्वांगीण उन्नतीची चळवळ गतिमान झाली याविषयी सर्वांचेच एकमत होईल. आचार्य अत्रे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा गौरव करताना म्हटले आहे की, “अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एका क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होत.’

महर्षी धोंडो केशव कर्वे यांची येथील समाजाने सुरुवातीच्या काळात अवहेलना केली असली तरी पुढे मात्र लोकांना त्यांच्या कार्याचे खरे मोल कळून चुकले. सर्वसामान्य लोकांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांचा उचित असा गौरव केला. बनारस (१९४२) व पुणे (१९५१) या विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी देऊन गौरविले. मुंबई विद्यापीठाने त्यांना एलएल. डी. ची पदवी (१९५७) प्रदान केली. भारत सरकारनेदेखील १८ एप्रिल, १९५८ रोजी ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करून त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment